संगमेश्वर: रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील करंजारी येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ५५ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. सदाशिव लक्ष्मण आव्हाण (रा. मठ तेलीवाडी, ता. लांजा) असे मृत इसमाचे नाव आहे.या प्रकरणी रितेश सदाशिव आव्हाण (रा. मठ तेलीवाडी, ता. लांजा) यांनी फिर्याद दिली आहे. श्रवणकुमार मांगीलाल परमार (रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. श्रवणकुमार परमार हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन देवळे ते पाली या दिशेने जात होता. दुचाकीच्या मागे सदाशिव आव्हाण बसले होते. दरम्यान, श्रवणकुमार यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली.या अपघातात सदाशिव आव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघातात श्रवणकुमार परमार यालाही दुखापत झाली आहे. या अपघातप्रकरणी देवाख पोलीस ठाण्यात श्रवणकुमार परमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंजारी येथे दुचाकी घसरून प्रौढाचा मृत्यू






