रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी आणि अंजनारी येथील प्रलंबित पुलांच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी शासनाने तब्बल ८४.५७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये केवळ पुलांचाच समावेश नसून, लांजा तालुक्यातील अंजनारी गाव आणि आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ जाणारा अंडरपास व सर्व्हिस रोडच्या कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
कोकणातील पावसाळा आणि भौगोलिक परिस्थिती पाहता या भागात पुलांची अत्यंत गरज होती. अनेक वर्षांपासून या पुलांच्या अभावामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः पावसाळ्यात, मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यातील अडथळे आणि शेतकऱ्यांची होणारी ओढाताण या सर्व समस्यांची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी शासन स्तरावर या कामाचा ध्यास धरला होता. अखेर ८४ कोटींहून अधिक निधी मंजूर झाल्याने या भागातील दळणवळणाची समस्या कायमची सुटणार आहे. बावनदी आणि अंजनारी येथील पूल हे स्थानिक संपर्कासाठी जीवनदायी ठरणार असून, यामुळे परिसरातील गावांचा मुख्य प्रवासाशी असलेला संपर्क अधिक दृढ होईल.
या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे. अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण झाल्यामुळे आता या भागातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. या मंजुरीमुळे आरवली आणि संगमेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या विकासकामांच्या माध्यमातून भविष्यात पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






