कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यपाल आर.एन. रवी यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174(2)(बी) अंतर्गत विधानसभा 7 मे 2026 पासून बरखास्त करण्याचा आदेश जारी केला आहे.
याबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विधानसभेचा कार्यकाळ संपताच संपूर्ण मंत्रिमंडळही बरखास्त करण्यात आले असून त्यामुळे Mamata Banerjee यांचे मुख्यमंत्रीपद अधिकृतरीत्या समाप्त झाले आहे. कोलकाता गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील 15 वर्षांची तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) सत्ता आता संपुष्टात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्यात काही दिवसांपासून राजकीय तणाव निर्माण झाला होता. मात्र, संवैधानिक प्रक्रिया राबवत राज्यपालांनी विधानसभा आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी 2011 पासून सलग सत्तेत होत्या आणि त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात विकासकामांसह अनेक वाद आणि हिंसाचाराच्या घटनाही चर्चेत राहिल्यात.
दरम्यान, भाजप नेते सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा ब्रिगेड परेड ग्राऊंड येथे सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.







