मुंबई: पैशांचे व्यवहार करताना बाजारात एखादी फाटकी किंवा खराब झालेली नोट हातात तर येणार नाही ना, या सर्वसामान्यांच्या धाकुधुकीला आता लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) कागदी चलनाला सक्षम पर्याय म्हणून बाजारात ‘पॉलिमर’ म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या जोरदार तयारीत आहे. नुकत्याच आरबीआयच्या पाटणा आणि मुंबई येथे पार पडलेल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये या महत्त्वाकांक्षी विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे.
देशात सध्या डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असला तरी रोख व्यवहारांचे प्रमाण आजही लक्षणीय आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिक अजूनही रोखीनेच व्यवहार करण्यास मोठी पसंती देतात. नुकत्याच समोर आलेल्या १५ मे पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील एकूण चलनी नोटांचे प्रमाण ११.५ टक्क्यांनी वाढून ४२.८६ ट्रिलियन रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. मात्र, या वाढत्या रोख चलनासोबतच कागदी नोटा खराब होण्याचे प्रमाणही मोठे आहे. कागदी नोटांचे आयुष्य मर्यादित असल्याने त्या लवकर फाटतात किंवा खराब होतात. अशा खराब झालेल्या नोटा बाजारातून परत गोळा करून त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावणे ही रिझर्व्ह बँकेसाठी आर्थिक आणि व्यवस्थापकीय दृष्ट्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आरबीआयला तब्बल २३.८ अब्ज खराब नोटा नष्ट कराव्या लागल्या होत्या. तसेच नवीन कागदी नोटांच्या छपाईवर सरकारचा ६,३७२.८ कोटी रुपयांचा प्रचंड निधी खर्च झाला आहे. हा अफाट खर्च आणि मनुष्यबळ वाचवण्यासाठी आरबीआयने आता प्लॅस्टिक नोटांचा पर्याय निवडला आहे.
कागदी नोटांच्या तुलनेत प्लॅस्टिक म्हणजेच पॉलिमर नोटांचे आयुष्य खूप जास्त असते. या नोटा सहजासहजी फाटत नाहीत, चुरगळत नाहीत आणि पाण्यात भिजून खराब होण्याचा धोकाही नसतो. सुरुवातीच्या टप्प्यात या नोटांच्या छपाईचा खर्च कागदी नोटांपेक्षा काहीसा जास्त वाटत असला, तरी त्यांच्या दीर्घायुष्यामुळे वारंवार नोटा छापण्याचा सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च भविष्यात वाचणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी आता देशभरातील एटीएम मशीन्स प्लॅस्टिक नोटांच्या वितरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचे नियोजन केले जात आहे. आरबीआयच्या या महत्त्वाच्या पावलामुळे देशातील चलन व्यवस्था अधिक मजबूत आणि आधुनिक होणार असून, नागरिकांनाही आता फाटक्या नोटांच्या कटकटीपासून कायमची मुक्ती मिळणार आहे.





