मुंबई: महाराष्ट्राच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्यांदाच ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ ही महत्त्वाची संकल्पना हाती घेतली असून, यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले मुख्य महामार्गांशी जोडण्यासाठी नवीन रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असणार असून, राज्यभरातील ११ ऐतिहासिक किल्ल्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर काम सुरू केले असून, याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मान्यता मिळाली आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यांत डीपीआर पूर्ण होणार आहे.
यात पुणे प्रादेशिक विभागातील पाच किल्ल्यांचा समावेश आहे. अनेकदा महामार्गावरून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ते खराब किंवा अरुंद असतात आणि ही समस्या सोडविण्यासाठी ही संकल्पना राबविली जात आहे. ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’अंतर्गत मुख्य रस्ता ते थेट किल्ला यादरम्यान नव्याने रस्ते तयार केले जाणार असल्याने महामार्गावरून थेट किल्ल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचता येईल. या प्रकल्पांतर्गत केवळ रस्तेच बनविले जाणार नाहीत, तर पर्यटकांच्या दृष्टीने स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग आणि किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देणारे फलक आदी सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपलब्ध केल्या जाणार आहेत.
या कॉरिडॉरमध्ये पुणे जिल्ह्यातील लोहगड, राजगड, शिवनेरी, कोल्हापूरमधील पन्हाळा, सातारा येथील प्रतापगड, रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग, नाशिकमधील साल्हेर, सिंधुदुर्गातील विजयदुर्ग व सिंधुदुर्ग, तसेच रायगड जिल्ह्यातील रायगड आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील गडदुर्ग पर्यटनाला वेगळीच गती मिळणार असून, मुख्य महामार्गावरून थेट किल्ल्यांपर्यंत दर्जेदार रस्ते तयार होणार आहेत.
यामुळे पर्यटकांचा प्रवासातील वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. रायगड केंद्रस्थानी ठेवून इतर किल्ले जोडले जाणार असल्याने पर्यटकांना आणि शिवभक्तांना एकाच वेळी सलग दोन ते तीन किल्ल्यांना सहज भेट देण्याचे नियोजन करता येईल. रस्ते चांगले झाल्याने पर्यटकांची संख्या वाढेल आणि पर्यायाने गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावकऱ्यांना, व्यावसायिकांना तसेच मार्गदर्शकांना रोजगार मिळणार आहे. रस्ते थेट गडाच्या जवळ पोहोचल्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ पर्यटकांनाही गडांना भेट देणे अधिक सोयीचे ठरणार आहे.






