नेवरे-काजीरभाटी समुद्राकिनाऱ्यावर स्टंट करणे पुण्यातील पर्यटकांना पडले महागात

Gramin Varta
128 Views

गाडी वाळूत रुतल्याने उडाली तारांबळ; चार तासांच्या थरारानंतर गाडी बाहेर

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाच्या भरात गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी गाड्या नेण्यास प्रशासनाकडून स्पष्ट मनाई करण्यात आली असली, तरीही काही हवेशी पर्यटक नियमांचे उल्लंघन करून किनाऱ्यावर वाहने नेत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुण्यावरून फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर थेट आपली गाडी घेऊन गेले होते. किनाऱ्यावर स्टंटबाजी सुरू असतानाच अचानक भरतीचे पाणी आल्यामुळे गाडी किनाऱ्यावरील वाळूत खोलवर रुतली.

या पर्यटकांनी वाळूत रुतलेली गाडी बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला स्वतःहून आटोकाट प्रयत्न केले, परंतु गाडी बाहेर निघण्याऐवजी ती अधिकाधिक वाळूत रुजत गेली. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या सल्ल्यानुसार व मदतीने जेसीबी बोलावण्यात आला. जवळपास तब्बल चार तास चाललेल्या या थरारानंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी वाळूतून बाहेर काढण्यात यश आले. गाडी बाहेर निघाल्यानंतर या पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला. दापोली तालुक्याप्रमाणेच आता रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांकडून अशा प्रकारे गाड्या नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4662090
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *