मराठी पत्रकार परिषद मंडणगड शाखेच्या अध्यक्षपदी सचिन माळी यांची निवड

Gramin Varta
23 Views

स्वातंत्र्य दिनी कार्यकारिणी जाहीर; ओळखपत्रांचे वितरण

मंडणगड : मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या मंडणगड शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी सचिन माळी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी भरत सरपरे, सचिव तथा जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधीपदी विजय जोशी, खजिनदारपदी प्रकाश महाडिक, तर सदस्य म्हणून दगडू जगताप व उमेश तबीब यांची निवड करण्यात आली. सर्वांनी मराठी पत्रकार परिषदेचे सदस्यत्व घेतले असून रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आनंद तापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंडणगड येथे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील पत्रकारांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे तसेच पत्रकारितेतील व्यावसायिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने शाखेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे, प्रशासनाशी संबंधित प्रश्न, सामाजिक व शैक्षणिक विषय तसेच सांस्कृतिक घडामोडींना प्रभावीपणे प्रसिद्धी देण्याबरोबरच जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची भूमिका पत्रकारांची आहे. ही जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पत्रकारांमध्ये समन्वय आणि संघटनात्मक बांधिलकी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्यासोबतच पत्रकारांना आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण, विविध विषयांवरील उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विधायक भूमिका बजावण्याचा मानस नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, सत्यता, वस्तुनिष्ठता आणि जनहिताला प्राधान्य देत पत्रकारिता करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनी ओळखपत्र वितरण

दरम्यान, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषदेच्या मंडणगड शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांना पत्रकार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या ओळखपत्र वितरण उपक्रमामुळे पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला अधिकृत स्वरूप मिळाले. समाजातील विविध घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडताना लोकशाही मूल्ये, सत्यता, सामाजिक बांधिलकी आणि जनहित यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Total Visitors :
4704008
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *