चिपळूण : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने यंदाचे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन १२ व १३ डिसेंबर २०२६ रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला मिळालेल्या आयोजनाच्या मानानिमित्त होणाऱ्या या संमेलनाचा शुभारंभ मराठी साहित्याचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात उत्साहात करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते संमेलनाच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी कोकणातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यिक, साहित्य संस्था आणि साहित्यप्रेमींनी एकत्र येऊन संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोकणाला साहित्यिक चळवळीची समृद्ध परंपरा लाभली असून रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने विविध साहित्यिक उपक्रम आणि संमेलने आयोजित केली जातात. चिपळूण हे जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याच्या साहित्यिक इतिहासात चिपळूण येथे विविध विषयांवरील अनेक संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाकडे साहित्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
चिपळूण येथे होणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनात कोकण मराठी साहित्य परिषद सहयोगी संस्था म्हणून सहभागी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील साहित्यिक संस्था, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी संमेलनाच्या आयोजनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या साहित्यिक चळवळीबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांना विशेष कौतुक असल्याचेही त्यांनी सांगितले. चिपळूणमध्ये होणाऱ्या संमेलनाला उपस्थित राहण्याची त्यांची इच्छा असल्याचा संदेशही प्रा. ढवळ यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वतीने कार्याध्यक्ष सुनील खेडेकर यांनी शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार केला. गतवर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नवनिर्माण संस्थेचे संस्थापक अभिजीत हेगशेट्ये यांनीही आगामी संमेलनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी साहित्य आणि संस्कृती मंडळाने वाचनालयाला जिल्हा साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. चिपळूणकरांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले संमेलन यशस्वी केले होते. चिपळूण शाखेच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम सुरू असून भविष्यातही ही साहित्यिक चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात चिपळूणमध्ये होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाचा शुभारंभ होत असल्याबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कार्यवाह मनीषा दामले यांनी आनंद व्यक्त केला. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबासाहेब पाटील, सचिव विलास राणे, व्यवस्थापन समिती सदस्य हनुमंत कदम, रामानंद लिमये, अरुण मोरे, कवयित्री उज्ज्वला बापट, शुभदा मुळे, लिंगायत, व्यवस्थापक, ग्रंथपाल स्वप्नील राजवाडकर तसेच कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कार्यवाह मनीषा दामले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, संचालक प्रदीप पवार, प्राची जोशी, शरद तांबे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या जिल्हा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चिपळूणच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवे व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चिपळूणमध्ये रंगणार रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन; मालगुंड येथे उत्साहात शुभारंभ
Leave a Comment





