GRAMIN SEARCH BANNER

घेरा यशवंतगड किल्ल्याची भिंत कोसळली; आमदार किरण सामंत यांचा पाहणी दौरा, निकृष्ट कामावर संताप

Gramin Search
14 Views

राजापूर/ राजन लाड: राजापूर तालुक्याजवळच्या नाटे येथील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामादरम्यान एक भिंत पावसाच्या पहिल्याच सरीने कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुरातत्व विभाग आणि संबंधित ठेकेदारावर निकृष्ट कामाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
किल्ल्याच्या डागडुजीसाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सध्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र, काम सुरू असतानाच भिंत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आमदारांचा तातडीचा दौरा आणि पाहणी

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आज तातडीने घेरा यशवंतगडला भेट देऊन संपूर्ण बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, पुरातत्व विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान, आमदार सामंत यांच्यासमोरच शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी ठेकेदार आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जाबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल जाब विचारला. नागरिकांचा रोष स्पष्टपणे दिसून येत होता.

स्थानिक कमिटीची स्थापना: कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

या घटनेची गंभीर दखल घेत आमदार सामंत यांनी प्रशासनाला स्थानिक पातळीवर ५ जणांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीत नाटे आणि साखरी नाटे या दोन्ही गावच्या सरपंचांचा समावेश असेल, तर उर्वरित तीन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून स्थानिक जनतेचा सहभाग, देखरेख आणि मत विचारात घेऊन बांधकाम दर्जेदार आणि पारदर्शक होईल, अशी ग्वाही आमदार सामंत यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार सामंत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेल्या या किल्ल्याचे पुनरुत्थान अतिशय दर्जेदार आणि आदराने झाले पाहिजे, यासाठी मी जातीने लक्ष देणार आहे. मात्र, या प्रकरणात कोणताही राजकारणाचा अंश नसावा.”

शिवप्रेमींच्या भावनांचा आदर आणि पुढील वाटचाल

घटनास्थळी उपस्थित अनेक शिवप्रेमी आणि ग्रामस्थ हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप पुरातत्व विभागावर करत होते. त्यांचा रोष आणि भावना लक्षात घेता, भविष्यातील काम अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी स्थानिक सहभाग आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि जतन हे केवळ सरकारी काम नसून, लोकांच्या श्रद्धेचाही भाग आहे. त्यामुळे यासंदर्भात जागरूकता, सहभाग आणि पारदर्शकता हाच पुढील वाटचालीचा मूलमंत्र ठरणार आहे. घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम आता स्थानिक समितीच्या देखरेखीखाली कशा प्रकारे पुढे सरकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Total Visitor Counter

3200209
Share This Article