वर्दळीच्या ठिकाणी अपघाताचा धोका, एसटी प्रशासनाची नगर परिषदेकडे मागणी
रत्नागिरी:रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक लोकार्पणानंतर प्रवासीवर्गाने अक्षरश: गजबजून गेलेले असते. पण या बसस्थानकाच्या आत तसेच बाहेर जाणाऱ्या दोन्ही गेटजवळ अपघाताची शक्यता लक्षात घेता मुख्य रस्त्यावर गतीरोधक बसवण्याची मागणी एसटी प्रशासनाच्यावतीने नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.
या बसस्थानकाच्या तळ मजल्यावर शहरी तर पहिल्या मजल्यावरून मुंबई पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवेसाठी ग्रामीण बसस्थानक कारभार सुरू झाला आहे. व्यापारी गाळे, दोन पोलीस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, दोन स्वच्छतागृहांसह विश्रांतीगृह, पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था अशा विविध सुविधांनीयुक्त अद्ययावत बसस्थानकामुळे प्रवाशांना ऊन पावसाचा होणारा त्रास संपला आहे.
आता दरदिवशी हे बसस्थानक प्रवाशी वर्गाच्या गर्दीमुळे गजबजून गेलेले असतानाच या बसस्थानकाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही गेटजवळ मुख्य रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचारी, प्रवासी वर्गाची मोठी वर्दळ असते. बसस्थानक लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी आत जाण्याच्या गेटजवळच बसखाली सापडून एका वृद्धाचे निधन झाल्याची घटना घडली होती.
त्यामुळे यापुढे अशाप्राकारे या बसस्थानकाच्या दोन्ही गेटजवळ होणारी मोठी वर्दळ लक्षात घेता मुख्य रस्त्यावर गतीरोधक बसवावेत. जेणेकरून येथील वेगातील वाहतूकीला नियंत्रण येऊन होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.