चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी आवश्यक असणाऱ्या मत्स्य बीज केंद्राची उभारणी आता लवकरच होणार असून, आमदार शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्ह्यातील मत्स्यपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी चिपळूण तालुक्यात दोन हेक्टर जागेवर मत्स्य बीज केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार निकम यांनी शासनाकडे सादर केला होता. या मागणीची दखल घेत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाला या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील मत्स्यपालकांना सध्या बीज उपलब्धतेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, हे केंद्र उभारल्यास येथील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. १०० टक्के राज्य शासन अनुदानातून हा प्रकल्प उभारला जाणार असल्याने जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला एक नवी दिशा मिळणार आहे. चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील मत्स्यपालकांना या सुविधेचा मोठा लाभ होणार असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता या केंद्राच्या उभारणीचा मार्ग सुकर झाला असून, लवकरच कामाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
