GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत समुद्राच्या उधाणामुळे घरांमध्ये शिरले खाडीचे पाणी; ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली

दापोली: दापोली तालुक्यातील अडखळ येथील जुईकर मोहल्ला परिसरात समुद्राला आलेल्या उधाणामुळे खाडीचे पाणी थेट घरांमध्ये शिरले आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, खाडीत उभ्या असलेल्या नादुरुस्त बोटींचे अवशेषही पाण्यासोबत वाहत येऊन घरांचे नुकसान करत आहेत. पाजपंढरी आणि अडखळ या दोन्ही गावांना समुद्राच्या या उधाणाचा मोठा फटका बसत असून, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अडखळ-जुईकर मोहल्ल्यातील सुमारे १,१०० मीटर लांबीच्या खाडीकिनारी असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पाण्यासोबत खाडीतील नादुरुस्त आणि तुटलेल्या बोटींचे लाकडी अवशेष वाहत येऊन घरांच्या भिंतींना धडकत आहेत, ज्यामुळे घरांचे नुकसान होत आहे. हे अवशेष घराजवळील मोकळ्या जागांमध्येही जमा होत आहेत.

समुद्राच्या उधाणामुळे घरांना होणारे नुकसान लक्षात घेता, या खाडीकिनारी १,१०० मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे. या भिंतीमुळे समुद्राचे पाणी आणि बोटींचे अवशेष घरांमध्ये येण्यापासून रोखता येतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Total Visitor Counter

2474942
Share This Article